Monday, 3 November 2014

खलनायकातला 'नायक'
















दाभोलकर यांच्या हत्येनंतर नगरला झालेल्या आंदोलनात अमरापुरकर  सहभागी  झाले  होते नगरमधील बहुधा हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम


निळू फुले व सदाशिव अमरापूरकर ही दोन माणसे अशी होती की ज्यांना पडद्यावर बघितले की त्यांच्याबद्दल प्रचंड राग यायचा. अनेक आया-बहिणी या दोघांनाही शिव्या घालायच्या इतक्या या दोघांच्याही भूमिका रांगड्या असायच्या. पण वास्तवात या दोन्ही माणसांचा सहवास ज्यांनी ज्यांनी अनुभवला त्यांना या दोघांइतकी प्रेमळ, नितळ माणसं क्वचितच भेटली असतील. हे दोघेही वास्तव जगातील खरेखुरे ‘नायक’ होते. अमरापूरकरांच्या निधनाची बातमी कळताच मला दाभोळकरांच्या हत्येचा दिवस आठवतो. गतवर्षी २० ऑगस्टला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. या घटनेने समाजजीवनाला हादरा बसला. नगरची आम्ही काही मंडळी दाभोळकरांना अखेरचे अभिवादन करण्यासाठी  साताऱ्याला  जाण्याचा विचार करत होतो. परंतु साताºयाला जाण्याऐवजी नगरलाच या हत्येच्या निषेधासाठी तातडीने आंदोलन करायचे ठरले. राष्ट्र सेवा दल, प्रेस क्लब या संघटनांच्या पुढाकारातून सायंकाळी शहरातील गांधी पुतळ्याजवळ या हत्येचा निषेध व दाभोळकरांना श्रद्धांजली असा कृती कार्यक्रम आम्ही ठरविला. या दिवशी सदाशिव अमरापूरकर नगरला होते. अमरापूरकर या आंदोलनात नक्की येणार याची खात्री होती. किंबहुना दाभोळकरांच्या वैचारिक परिवाराचे एक सदस्य म्हणून अमरापूरकरांना या आंदोलनाची माहिती कळविणे ही आमची जबाबदारी होती. त्यादिवशी उमेश घेवरीकर व भगवान राऊत हे दोन स्थानिक कलारसिक कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते. या दोघांच्या माध्यमातून त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. ‘डॉक्टरांची हत्या झाली आहे. आम्ही सगळे सायंकाळी मूक निदर्शने करणार आहोत’ असे त्यांना सांगितले. त्याक्षणी ते म्हणाले, ‘मला चालता येत नाही. पाय सुजले आहेत. पण पाच मिनिटे का होईना मी या आंदोलनात येईल.’ अन् ठरल्याप्रमाणे सायंकाळी अमरापूरकर गांधी पुतळ्याजवळ आले. पाय सुजले असताना आंदोलनात उभे राहिले. ते अत्यंत गंभीर अन् उदास होते. चार-पाचच वाक्य ते बोलले. ते म्हणाले, ‘एखादे मशिन बंद करावे तसेच दाभोळकरांना गोळ्या घालून संपविण्यात आले. आपले वडील गेल्यानंतर जेवढे दु:ख झाले नव्हते तेवढ्या वेदना या घटनेने झाल्या. मला परिवर्तनवादी विचाराचे बाळकडू दाभोळकरांकडून मिळाले. दाभोळकरांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेच्या तोंडावर असल्याचे लक्षण आहे. राज्य सरकारने आतातरी जादूटोणा विधेयक मंजूर करुन त्यांना श्रद्धांजली वहावी’. अमरापूरकर यांचा नगरमधील बहुधा हा शेवटचा लढा व सार्वजनिक कार्यक्रम. यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कुठल्या कार्यक्रमात दिसले नाहीत. दाभोळकर यांच्या हत्येपूर्वी दोन महिने अगोदर अमरापूरकर व दाभोळकर यांनी सोनई हत्याकांडातील पीडित कुटुंबाला नगरमध्ये ‘साधना सहवेदना निधी’ दिला होता (जेव्हा नगरचे समाजधुरिण या हत्याकांडाबाबत प्रतिक्रिया देणेही राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे मानत होते ). अमरापूरकर हे आलिशान व ‘ग्लॅमर’स जगात रमणारे अभिनेते नव्हते. राष्टÑ सेवा दलासारख्या संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. समाजात परिवर्तनाची बिजे रोवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी पूर्णवेळ काम करायला हवे व अशा कार्यकर्त्यांना जगविण्याची जबाबदारी समाजाने घ्यायला हवी असे श्रीराम लागू, निळू फुले, अमरापूरकर यांना वाटत होते. त्यातूनच सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याची जी चळवळ राज्यात राबली त्यात या सर्वांनी असा निधी जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. या निधीतून पुढे अनेक कार्यकर्ते उभे राहिले. एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला येण्यासाठी अमरापूरकर यांनी आढेवेढे घेतले किंवा मानधन मागितले असे कधी घडले नाही. हा नगरी माणूस राष्टÑीय स्तरावर गेला. पण नगरशी व समाजाशी असलेली त्यांची नाळ तुटली नाही. गतवर्षी नगरमध्ये सावेडी क्रीडा संकुलात एका कार्यक्रमात त्यांनी नगरच्या दुरवस्थेबाबत जाहीर भाष्य केले. ‘मी लहानपणापासून नगर आहे तेथेच बघतो आहे. येथे सुधारणाच होत नाहीत’ अशी नाराजी त्यांनी नोंदवली होती. त्यांच्या या विधानाने सत्ताधाºयांच्या भुवया उंचावल्या. पण अमरापूरकर जे बोलत ते मनापासून. ते कुणाचीही भीती बाळगत नव्हते. गतवर्षी राज्य नाट्य परिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीतही बरेच वादविवाद सुरु होते. त्यावेळी ‘लोकमत’साठी त्यांनी नगरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नाट्यपरिषदेलाही सुनावले. ‘नाट्य, साहित्य परिषदा या राजकारण्यांनी व्यापल्या आहेत. संमेलने भरविण्याऐवजी नाटकांना व कलावंतांना बळ दिले तरी रंगभूमीचे भले होईल’ असे ते म्हणाले होते. अमरापूरकर हे नगर जिल्ह्याचे भूषण होते. नगरसाठी हा केवढा मोठा ‘माणूस’ होता. नगरकरांनी त्यांना अभिमानाने मिरवायला पाहिजे होते. पण त्यांची अशी मिरवणूक पाहण्याची संधी मिळाली नाही. उद्या या नायकाची नगरमधून मिरवणूक निघेल. पण दुर्दैवाने ‘अखेरची’.

-सुधीर लंके